वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख
वर्धा, दि.१३ (जिमाका) : जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रशासनाशी निगडित असलेले प्रश्न सोडविण्यासाठी सोमवार दि.१६ रोजी फेब्रुवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार, खनिकर्म राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबार आयोजित करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील नागरिकांचे प्रशासनाशी निगडित असलेले प्रश्न, प्रलंबित विषय सोडविण्यासाठी या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पालकमंत्री डॉ.पंकज भोयर हे सर्वसामान्य नागरिकांची निवेदने, समस्या, प्रश्न समजून घेतील आणि ते सोडविण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश देतील. जनता दरबार मध्ये सर्व जिल्हास्तरीय अधिकारी देखील उपस्थित राहणार आहे.
जिल्ह्यातील नागरिकांना आपल्या काही समस्या, प्रश्न असतील किंवा विविध विषयांवर पालकमंत्र्यांना निवेदन द्यावयाचे असल्यास संबंधितांनी लेखी स्वरूपात आपली समस्या दि.१६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहून मांडावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांनी केले आहे
.

Post a Comment
0 Comments