“
उत्सव संस्कृतीचा… जल्लोष युवा शक्तीचा!”
२१ फेब्रुवारी रोजी सांस्कृतिक महोत्सव २०२६ उत्साहात संपन्न
वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख
दिनांक शनिवार, २१ फेब्रुवारी २०२६ रोजी विद्या विकास शिक्षण संस्था, हिंगणघाट द्वारा संचालित विद्या विकास प्ले स्कूल अँड कींडर गार्डन व विद्या विकास प्राथमिक शाळा व हायस्कूल हिंगणघाट यांच्या संयुक्त विद्यमाने “सांस्कृतिक महोत्सव २०२६” मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ११.०० वाजता उद्घाटन समारंभाने झाली. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मा. डॉ. नयना उमेश तुळसकर, (नगराध्यक्ष न. प. हिंगणघाट) उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ मा. डॉ. जया निलेश तुळसकर (संचालिका, विद्या विकास शिक्षण संस्था) होत्या. प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री. विजयराव इटनकर (सहसचिव, विद्या विकास शिक्षण संस्था), मा. डॉ. उमेश पा. तुळसकर अध्यक्ष विद्या विकास शिक्षण संस्था हिंगणघाट, मा. डॉ. राजविलास कारामोरे प्राचार्य तुळसकर इंस्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, मा. डॉ महेंद्र गुंडे प्राचार्य तुळसकर कॉलेज ऑफ फार्मसी, मा. डॉ. सपना जयस्वाल उप-प्राचार्य मातोश्री आशाताइ कुणावार महिला महाविद्यालय हिंगणणघाट, मा. श्री. विलास राऊत प्राचार्य ब्रिलीयांत स्कूल हिंगणघाट यांनी कार्यक्रमास मानाची उपस्थिती दिली.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. श्री नितेश रोडे प्राचार्य विद्या विकास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज हिंगणघाट यांनी केले. कार्यक्रमाचे उद्घाटक मा. डॉ. नयना उमेश तुळसकर यांनी आपल्या भाषणातून आजच्या काळात विद्यार्थ्यांवर संस्कार व नैतिक मूल्ये रुजविण्याची गरज आहे हे पटवून दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा मा. डॉ. जया निलेश तुळसकर यांनी अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याकरिता संस्कृतिक कार्यक्रम किती महत्वाचा आहे हे पटवून दिले व विद्यार्थ्यांना हा स्टेज उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेचे कौतुक केले. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. “संस्कृती जपली तरच समाज बळकट होतो,” असा संदेश त्यांनी दिला.
दुपारी १२ ते ४ या वेळेत रंगलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नृत्य, नाटिका, देशभक्तीपर गीते, लोककला सादरीकरण, लेझीम, ढोल-ताशा आदी विविध कलाप्रकार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. पारंपरिक वेशभूषा आणि प्रभावी सादरीकरणामुळे कार्यक्रमाला चारचाँद लागले. पालक व नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे मनापासून कौतुक केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य, शिक्षकवृंद व संयोजन समितीतील सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. मानकर व आभार प्रदर्शन श्री. टिपले यांनी केले.
एकूणच, “सांस्कृतिक महोत्सव २०२६” हा कार्यक्रम संस्कृतीची परंपरा जपत युवा शक्तीचा उत्सव ठरला.



Post a Comment
0 Comments